Drop Down MenusCSS Drop Down MenuPure CSS Dropdown Menu

सर्व शिक्षक बंधू भगिनींचे माझ्या नवीन ब्लॉग वर हार्दिक हार्दिक स्वागत.

Wednesday, 11 January 2017

जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा"





"जिजाऊ जयंती विशेष - नक्की वाचा"


© हि माहाती Pdf मध्ये डाऊनलोड करण्यासाठी click here
असं म्हणतात कि इतिहासाच्या पानांमध्ये हरखून न जाता येणाऱ्या भविष्याकडे वाटचाल करावी, परंतु याच इतिहासात अशी काही सोनेरी पानं असतात जी न कि केवळ आपल्याला आपल्या चुकलेल्या मार्गाची जानिव करून देतात, येणाऱ्या भविष्याचा मार्गही त्याच्या दिव्यत्वाने उजाळून टाकतात.
आपला महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राची लेकरं या बाबतीत नशीबवानच ! कारण तसा वारसाच आम्हाला लाभला आहे, इतिहासातील प्रत्येल पण म्हणजे हिऱ्या - मानकांच्या शब्दांनी रचलेले निखळ सोनेरी पानं !
या मातीत थोर संत झाले , विचारवंत हि झाले ! इथेच वीर जन्माला आले, आणि इथेच आम्हाला हजारो वर्षांच्या निद्रेतून जागे केले ते समाजसुधारकांनी !
आज या इतिहासाची उजळणी करावी वाटली कारण आज १२ जानेवारी !
याच महान महाराष्ट्राच्या एका नव्या इतिहासाला जन्म देणाऱ्या माउलींची जयंती ! हरवलेल्या स्वाभिमान आणि अस्तित्वाला पुनरजन्म देणारी माता !
आपल्या पोटचा गोळा स्वराज्यास अर्पण करून या मातीला आपला पहिला छत्रपती राजा देणारी माता म्हणजेच राजमाता जिजाऊ मॉ साहेब यांची जयंती.
अगदी कालपरवाच अखंड क्रांतीज्योती सावित्रीबाईंची हि जयंती पार पडली, कुठे कुठे या जयंत्या मोठ्या प्रमाणावर साजऱ्या हि होत असतील.
आजच्या या दिनी आम्हाला एक प्रश्न पडलाय कि ज्या इतिहासाचे दाखले देऊन आम्ही नवीन पिढी घडवण्याचे स्वप्न पाहतो निदान त्या इतिहासाने तरी
आमच्या या प्रेरणामुर्तींसोबत न्याय केलाय का?
जिजाऊ शिवाय शिवबा छत्रपती झाला असता ?ज्योतीराव कुणाच्या खांद्याला खांदा लाऊन स्त्री शिक्षणासाठी झगडले असते ? या थोर स्त्रीयान्शिवाय इतिहास हा इतिहास तरी झाला असता का ? शेवटी इतिहासाला जन्म द्यायला हि एक माउली च लागते हे हि आम्ही विसरलो ?
ज्या समाजात हजारो वर्षे स्त्रियांना दुय्यम वागणूक दिली जाते, दुर्गा - शक्ती अशी उपमा तर देतात पण सर्वात जास्त अत्याचारहि तिच्यावरच होत असतात, मग अश्या समाजाला जिजाऊ - सावित्रीबाई सारख्या असामान्य महिलांची ओळख करून देण्यात हा इतिहास का कमी पडला ?
आज हि स्त्री हि दुय्यमच, मग ती दलिताची असो वा सवर्णा ची ! हिंदूंची असो व मुस्लिमांची ! तीच गुलामगिरी तोच अन्याय ! अगदी आमच्या घरा -घरापर्यत हि असमानता ! आज हि गर्भातच तिची हत्या !
मग हे धड धडीत सत्य समोर असतांना का इतिहासकार का कमी पडले ह्या असामान्य स्त्रियांचे संस्कार रुजवण्यात ! बर ज्यांनी प्रयत्न केले त्यांच्या पाठीशी समाज तरी उभा राहिला का ?
आजचा दिवस म्हणजे एक नवा इतिहास जन्माला घालणाऱ्या माउली चा जन्म दिवस !
इतिहास निर्माण करणे म्हणजे झालेल्या चुकांना सुधारून पुन्हा नवा इतिहास घडवणे … मग आजच्या या दिवशी करूया एक संकल्प….
स्त्रियांचे हिरावलेले हक्काचे स्थान त्यांना प्राप्त करून देण्याचा ! आमच्या माता - भगिनी आणि मुला-मुलींमध्ये जिजाऊ आणि सावित्री चे संस्कार रुजवण्याचा ! येणाऱ्या पिढीला जिजाऊ - सावित्री सारख्या स्त्रियांची खरी ओळख करून देण्याचा !
इतिहासातील हरवलेले हे सोनेरी पान समाजासमोर उघडे करण्याची आज खरी गरज आहे, खात्री आहे येणारा काळ त्यांच्या विचारांनी - संस्कारांनी उजाळून जाईल !
याची सुरुवात आपल्या घरापासून करा ! तुमच्या मुलीमध्ये जिजाऊ आणि सावित्री बघायला सुरुवात करा ! फ़क़्त तिलाच नवनिर्माणाचे सामर्थ्य आहे, त्यांच्या हातूनच या राष्ट्राचे नव - निर्माण घडू दे !!
पुन्हा एकदा राजमाता - राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांना अभिवादन !
जय जिजाऊ - जय शिवराय
सौजन्य :
आपलेच कार्यकर्ते,
जिजाऊ.कॉम
www.jijau.com



〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓〓


राजमाता जिजाबाई

 जिजाऊ … जिजामाता … राजमाता जिजाबाई भोसले … मराठी साम्राज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री … अशा अनेक नावानी आपण यांना ओळखतो. ज्या वयात बाहुल्यांचा खेळ मांडून संसाराची तालीम करण्यात मुलं दंग असतात, त्या वयात जिजाऊ तलवारीची मूठ घट्ट पकडण्यात दंग होत्या. मुलं आईकडून सदाचार व प्रेमाचा, तर वडिलांकडून कर्तृत्वाचा वसा घेतात, पण जिजाऊ त्याला अपवाद आहेत.          

  सिंदखेडचे पाच हजारी मनसबदार लखुजी जाधव आणि म्हाळसाबाई यांच्या पोटी जिजाऊंचा जन्म झाला. कर्तृत्ववान पित्याच्या पराक्रमाचे पोवाडे पाळण्यात असल्यापासून जिजाऊंच्या कानावर होते. वाढत्या वयासोबत पारतंत्र्याची जाणीवही वाढत गेली आणि लाचारीच्या व फितुरीच्या रोगाचा त्या मनापासून तिरस्कार करू लागल्या.  पुढे डिसेंबर इ.स. १६०५ मध्ये जिजाबाईंचा शहाजीराजांशी दौलताबाद येथे विवाह झाला.           

पुढे लखुजी जाधव व शहाजीराजे भोसले यांच्यात राजकीय बेबनाव निर्माण झाला. जिजाबाईंनी आपल्या पतीशी एकनिष्ठ राहत आपल्या माहेराशी संबंध तोडले. जिजाबाईंना एकूण आठ अपत्ये होती. त्यापैकी सहा मुली व दोन मुलगे होते. त्यांचा थोरला मुलगा संभाजी हा शहाजी राजांजवळ वाढला तर शिवाजी राजांची संपूर्ण जबाबदारी जिजाबाईंवर होती. नात्यांना, भावनांना बाजूला सारुन आपल्या कर्तव्यात कसल्याही प्रकारचा कसूर न होऊ देता धैर्याने आणि खंबीर पणे आल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचा जिजाबाईंचा हा गुण शिवाजी राजांत पुरेपुर उतरला होता.           

 शहाजी राजे बंगळूरात वास्तव्यास असतांना शिवाजीराजांच्या आई व वडिलांची चोख जबाबदारी जिजाबाईंनी मोठया कौशल्याने पेलली होती. शिवाजीराजे १४ वर्षांचे असताना शहाजी राजांनी त्यांच्या हाती पुण्याची जहागीर सुपूर्त केली. अर्थातच जहागीरीची वहिवाट लावण्याची जबाबदारी जिजाबाईंवर येऊन पडली. दादोजी कोंडदेव व इतर कुशल अधिकार्‍यांसमवेत जिजाबाई आणि शिवाजी राजे पुण्यात येऊन दाखल झाले. राजांच्या शिक्षणाची जबाबदारी पेलली. जिजाऊंनी शिवरायांना गोष्टी सांगितल्या त्या पारतंत्र्यात सुरू झालेल्या आणि स्वातंत्र्यात संपलेल्या. सीतेचे हरण करणार्या रावणाचा वध करणारा राम किती पराक्रमी होता, बकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता. प्रत्येक पराक्रमी पुरुषाच्या जीवनाचे ध्येय एकच असते, जे पारतंत्र्यात असतात, त्यांना स्वातंत्र्य मिळवून देणे, ही त्यांनी शिवरायांना दिलेली शिकवण होती. आणि त्यासोबत आपण- समाज, तू आणि मी ही - पारतंत्र्यात आहोत, ही प्रत्येक कथेनंतर दिलेली जाणीव होती. कर्तृत्व गाजविण्याचा एकमेव मार्ग म्हणजे स्वराज्य स्थापन करणे ही शिवरायांची धारणा झाली, ती जिजाऊंच्या या संस्कारांमुळेच.राजांना घडवताना त्यांनी फक्त रामायण, महाभारतातील गोष्टी नाही सांगितल्या तर शेजारी सदरेवर बसवून राजकारणाचे पहिले धडेही दिले.         

     शिवरायांच्या मनात कर्तृत्वाची ठिणगी टाकतानाच जिजाऊंनी त्यांना राजनीतीही शिकविली. समान न्याय देण्याची वृत्ती आणि अन्याय करणार्याला कठोरात कठोर शिक्षा देण्याचे धाडस दिले . शस्त्रास्त्रांच्या प्रशिक्षणावर स्वत: बारकाईनं लक्ष ठेवले . शहाजीराजांची कैद व सुटका, अफझलखानाचे संकट, आग्रा येथून सुटका अशा अनेक प्रसंगांत शिवरायांना जिजाऊंचे मार्गदर्शन लाभले. शिवराय मोठ्या मोहिमांवर असताना, खुद्द जिजाऊ राज्यकारभारावर बारीक लक्ष ठेवत असत. आपल्या जहागिरीत त्या जातीने लक्ष घालत. सदरेवर बसून स्वत: तंटे सोडवत.          

 राजांच्या सर्व स्वार्‍यांचा, लढायांचा तपशील त्या ठेवत. त्यांच्या खलबतांत, सल्ला मसलतीत भाग घेत. राजांच्या गैरहजेरीत स्वत: राज्याची धुरा वहावत. शिवाजी राजे आग्र्याच्या कैदेत असताना राज्याची पूर्णत: जबाबदारी उतारवयातही जिजाबाईंनी कौशल्याने निभावून नेली. शिवाजी राजांचा राज्याभिषेक व हिंदवी स्वराज्याची स्थापना पाहून राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी १७ जून, इ.स. १६७४ ला त्यांनी स्वतंत्र हिंदवी स्वराज्यात शेवटचा श्वास घेतला, आपल्या वयाच्या ८० व्या वर्षी जिजाबाईंचे रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी वृद्धापकाळाने निधन झाले,या गावी राजमाता जिजाबाईंची समाधी आहे.    

    आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रम अशा राजस व सत्त्वगुणांचे बाळकडू देणार्‍या राजमाता जिजाऊ भोसले !!! -